साउदॅम्पटन – भारतीय क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह यांना विश्रांती दिली जाणार आहे.
भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी-20 व तीन एक दिवसीय सामने तसेच दोन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी सामने हे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा एक भाग असल्यामुळे त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याकरिताच कोहली व बुमराह यांचा कसोटी संघात स्थान दिले जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंचे विंडीजमध्ये आगमन होण्यापूर्वी भारताच्या मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आदी खेळाडूंना तेथील स्थानिक संघांकडून सराव करण्याची संधी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृणाल पांड्या, श्रेयस अय्यर, राहुल चहार, संजु सॅमसन आदी युबा खेळाडूंना अनुभव मिळावा यासाठी या दौऱ्यात भारतीय
संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.