पक्षाचा झेंडा अन् माढ्याच्या विधानाने चर्चांना उधाण : प्रभाकर देशमुख यांना अपक्ष उतरविण्याची शक्यता
– सम्राट गायकवाड
सातारा – अनेक नेते आले आणि गेले तरीही माणदेशातील दुष्काळ अद्याप कायम आहे. दुष्काळ म्हटले की साहजिकच राजकीय नेत्यांचे दौरे ठरलेले. एकूणच माणदेश, दुष्काळ आणि राजकीय नेत्यांच्या दौऱ्याचे आता एक घट्ट नाते झाले आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी माण तालुक्याचा दुष्काळ पाहणीचा झंझावती दौरा केला. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी सरकारला गंभीर इशारा दिला. एवढेच नव्हे तर, दुष्काळग्रस्तांना देण्यात आलेल्या टॅंकरचा शुभारंभ राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून केला. तसेच माढ्याच्या उमेदवाराला मते दिली का? अशी दुष्काळग्रस्तांना विचारणा देखील केली. त्याचप्रमाणे माणदेशाच्या दुष्काळ निवारणाची जबाबदारी माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यावर सोपवून एकप्रकारे माण-खटाव मतदारसंघात अपक्ष उतरविण्याचे संकेत दिले. परिणामी माण-खटाव मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
माण विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता किंगमेकर स्व.सदाशिव पोळ यांच्या माध्यमातून खा.शरद पवार यांचा कायम होल्ड ठेवण्याचा प्रयत्न केला. सन 2009 च्या निवडणुकीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व पवारांनी केले. माढा मतदारसंघात माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाल्याने पवारांचा प्रभाव कायम होता. मात्र, लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ.जयकुमार गोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पोळ यांचा पराभव केला. पुढे सन 2014 च्या निवडणुकीत गोरे यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर दुसऱ्यांदा विजय संपादित केला. गोरे यांनी घौडदौड करत असताना राष्ट्रवादीला सर्वप्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला.
माणदेशाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच दुष्काळाच्या छायेत कसे ठेवले, हा मुद्दा गोरे यांच्या प्रचारात कायम अग्रस्थानी राहिला. दरम्यान, तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालिन केंद्रीय कृषी शरद पवार कार्यरत असताना उरमोडी धरणाचे पाणी माणदेशाच्या शिवारात पोहचले. पाण्याचे श्रेय आ. गोरे यांनी घेतले व घेत आहेत. मात्र, आता काल झालेल्या दुष्काळी दौऱ्यात प्रभाकर देशमुख यांनी पाणी पवारांच्या सहकार्याने आणले असल्याचा दावा केला आहे. देशमुखांनी नेमक्या मुद्दयावर बोट ठेवून गोरे यांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी टिकाटिप्पणी देखील होताना दिसून येईल.
दुसऱ्या बाजूला पवारांनी माण तालुक्यात नुकताच दुष्काळी दौरा केला. दौऱ्या दरम्यानच्या काही बाबींमुळे राजकीय अर्थ निघण्यास वाव आहे. विशेषत: दुष्काळग्रस्तांशी चर्चा करताना त्यांनी, माढ्याच्या उमेदवार संजय शिंदे यांना मते दिली का? अशी विचारणा केली. त्याचबरोबर निकालानंतर संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षाचा राजीनामा देतील आणि आमच्या सोबत दिल्लीत दिसतील, असे आत्मविश्वासाने सांगितले.
तर दुसऱ्या बाजूला म्हसवड येथे पाणी टॅंकर वाटपाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या व्यासपिठावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये राष्ट्रवादीचा लोगो तथा निवडणूक चिन्हाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर टॅंकर वाटपाचा शुभारंभ राष्ट्रवादीचा झेंडा फडकावून करण्यात आला. सर्व बाबींमुळे राजकीय अर्थ निघण्यास सुरुवात झाली आहे. कारण, सातारा जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने मिळविण्यात पवार यशस्वी झाले आहेत. मात्र, अद्याप कराड-दक्षिण व माण-खटाव मतदारसंघात यश मिळत नसल्याची खंत त्यांच्या मनात आहे.
आजपर्यंत त्यांनी यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा माढा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने माण-खटाव मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी त्यांनी माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांना माण-खटावमधून उतरविण्याची जवळपास पूर्ण तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल काय व कसे लागतात, यावर आगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीचे सूत्र ठरणार आहे. आघाडी झाली आणि जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली तरी त्यांनी सन 2009 चे सूत्र अवलंबवायचे हे निश्चित झाले आहे. सन 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेले आ. गोरे यांनी बंडखोरी करून विजय संपादित केला होता. आता आगामी निवडणुकीत देशमुख ही गोरेंप्रमाणे बंडखोरी करतील आणि अपक्ष निवडणूक लढवतील, अशी शक्यता घटनाक्रमावरून नाकारता येत नाही.