मुंबई – भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी त्यांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ही याचिका नासिर बिलाल यांनी दाखल केली आहे. एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवताना साध्वी प्रज्ञा यांनी खराब प्रकृतीचे कारण दिले होते. साध्वी यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते.
दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांनी मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे सांगितले आहे. साध्वी प्रज्ञा बुधवारी सकाळी भोपाळमधील भाजपा कार्यालयात आल्या होत्या. तिथे भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
भोपाळच्या जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आलोक सांजर यांना 7.14 लाख मते मिळाली होती. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी आहेत.