आपल्या भावी पिढीला आर्थिक व्यवहारात संपूर्ण स्वावलंबी करण्यासाठी संपूर्ण अर्थकारण नीट समजावून सांगणे तसेच वेळोवेळी गरजेनुसार मार्गदर्शन करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.
आर्थिक नियोजन करताना भावना दूर ठेवून विचार करावा लागतो. अर्थात प्रत्येकवेळी तसे घडलेच याची शंभर टक्के खात्री देता येत नाही. म्हणूनच आपल्या आर्थिक सवयी येणाऱ्या काळात आपल्या मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम करणार आहेत का याचा विचार करणे आवश्यक ठरते. अनेक आर्थिक त्रासांची सुरवात आर्थिक व्यवहारात शिस्त न पाळल्यामुळे होत असते. कपडालत्ता आणि गरजेच्या म्हणत ऐषोआरामीच्या सर्व गोष्टी मुलांना सहज उपलब्ध होत असल्याने त्यांना पैशाचे नेमके मोल कळते का याची खबरदारी पालकांनाच घ्यावी लागते. आईवडिलांनी कष्टाने कमावलेला पैसा सहजरीत्या खर्च करताना नव्या पिढीला अजिबात संकोच वाटत नाही किंवा हा पैसा कमावण्यासाठी किती कष्ट पडले असतील याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. यामुळेच प्रत्येक पालकाने स्वतः कमावलेल्या पैशाची गुंतवणूक कुठे आणि कशी करायाची याचे मार्गदर्शन करताना स्वतःच्या कृतीतून उदाहरणे घालून दिली पाहिजेत.
मुलांवरील अर्थसंस्काराची जबाबदारी पालकांची (भाग-२)
बहुतांशी घरात निर्माण होणारे कौटुंबिक कलह हे पाल्याच्या वर्तणुकीमुळे सुरु होत असतात. घरातील भावी पिढी मनाला येईल तसा खर्च करत असते. बराच वेळा घरातील वडीलधारी मंडळी,विशेषतः पाल्याची आई जास्त लाड करत असल्याने सढळ हाताने खर्चासाठी पैसे उपलब्ध होत राहतात. मग मुलांकडून पाहिजे तसा पैसा खर्च होत राहतो. हे करत असताना आवश्यक व अनावश्यक खर्चाचा नीट विचार केला जात नाही. पालकांनी दिलेला पॉकेटमनी कशात खर्च करावा, त्यातून पैशाचे नियोजन कसे करावे, काही पैसे वाचवता येतील का, त्यासाठी काही गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत का याबाबत तरुणपिढी फारसा विचार करताना दिसत नाही. मुलांना पॉकेटमनी देणे गैर नाही परंतु तो देत असताना पैशांचे योग्य नियोजन कसे करावे या पैशातून काही रक्कम पुढील काळासाठी वाचवता येईल का, गुंतवणुकीच्या नियोजनाचे नेमके फायदे काय याबाबत मुलांशी चर्चा करणे गरजेचे आहे.