सकृतदर्शनी पाहिले तर निवड़णुकीची तयारी करणे आणि गुंतवणुकीचे व्यवस्थापन यात काही संबंध आहे असे दिसत नाही. असे असले तरी सत्ता असो किंवा संपत्ती दोन्ही प्राप्त करणे सोपे नाही. त्यासाठी शिस्तबद्ध मेहनत घ्यावी लागते आणि त्याचबरोबर ती टिकवणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. त्यावरूनच तुमची सत्ता किंवा संपत्ती किती काळ टिकणार हे अवलंबून असते. निवडणुकीत कोण जिंकला आणि कोण पराभूत झाला हे ओळखणे सहजसोपे असते. ज्याला जास्त मते मिळतात तो विजयी ठरतो. अर्थकारणात मात्र तसे करण्यास वाव नसतो.
उमेदवाराने सगळी संपत्ती रिअल इस्टेटमध्येच गुंतवली आहे की त्याने संपत्ती हुशारीने विविध पर्यायांमध्ये गुंतवली आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. त्याने सगळ्या मुदत ठेवी केल्या आहेत की, पैसा गुंतवताना इक्विटी आणि डेटचा चांगला मेळ घातला आहे? संपत्तीचे व्यवस्थापन हा खरे तर खासगी मामला असतो. परंतु आता निवडणूक लढवण्यासाठीचे कायदे आणि नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती जाहीर करावी लागते. त्यामुळेच हे हुशार राजकीय नेते कशाप्रकारे गुंतवणूक करत असतात आणि खरोखरच हुशारीने करत असतात का, हे पाहण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळू लागली आहे. देशभरातील अशाच काही उमेदवारांच्या गुंतवणुकीचा लेखाजोखा.