नवी दिल्ली – साध्वींच्या वक्तव्यामुळे भाजपचा देशविरोधी चेहरा समोर आला आहे. शहिदांबद्दल अनादर दाखवून त्या पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसकडून सोडण्यात आले. साध्वींच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही पक्षाने केली.
साध्वींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी भाजपबरोबरच मोदींवर निशाणा साधला. शहिदाचा उल्लेख देशविरोधी म्हणून करून भाजपने माफ न करता येण्याजोगे पाप केले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत फासावर लटकावण्यात आलेल्या अजमल कसाब या दहशतवाद्याचा भाजप मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे. मोदीच त्यांच्या पक्षातील लोकांना अशाप्रकारची वक्तव्ये करण्यास सांगतात हे आम्हाला माहीत आहे. शहिदांच्या बलिदानाविषयी आदर असेल तर मोदींनी भाजपच्या उमेदवार असणाऱ्या साध्वींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भारताचे रक्षण करताना करकरे यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्याविषयी आदराची भावनाच बाळगली जायला हवी. असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.