मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार दहा मतदारसंघात एकूण 62.91 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली होती. सायंकळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असल्याने अंतिम आकडेवारी जाहिर करण्यात आली नव्हती. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज या 10 मतदारसंघात 62.91 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. हिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक राहिली असून सर्वात कमी टक्केवारी सोलापूर मतदारसंघाची राहिली आहे.
दुसऱ्या टप्प्यात 10 मतदारसंघात एकूण 1 कोटी 16 लाख 67 हजार 506 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 62 लाख 86 हजार 879, स्त्री 53 लाख 80 हजार 575 आणि 52 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे.