पवार परिवारातील कुणीही यंदा संसदेत जाणार नाही
कोल्हापूर – महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या भाजप शिवसेना युतीच्या 45 जागा निवडून येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा आम्ही जिंकणार आहोत, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पत्नी अंजली, आई सरस्वती पाटील, सासू शुभदा खरे यांच्यासह सकाळी साडे दहाच्या दरम्यान तपोवनवरील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरात भाजप शिवसेनेची मुळची ताकद आहे. त्याला सतेज पाटील यांच्या “आमचं ठरलंय’ने बळ मिळाले. त्यामुळे कोल्हापूरमध्ये तर काहीच अडचण नाही. हातकणंगले मतदारसंघामध्ये विनय कोरे यांनी जाहीर घोषणा केली नसली तरी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची 2 लाख मते धैर्यशील माने यांच्या कोट्यामध्ये वाढली असल्याचा दावाही पाटील यांनी केला. पवार परिवारातील कुणीही यंदा संसदेत जाणार नाही असे सांगतानाच राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.