फुटीरवादी नेत्यांना वेगळे पाडल्याचा सकारात्मक परिणाम
श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पण लोक स्वतःचा विरोध व्यक्त करण्यासाठी नागरी निदर्शनांचा मार्ग अवलंबत असल्याचा खुलासा सैन्याच्या अंतर्गत अहवालाद्वारे झाला आहे. तीन दिवस चाललेल्या सैन्य कमांडर्स परिषदेत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी यावर चर्चा केली आहे.
सैन्याच्या अंतर्गत अहवालानुसार मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून काश्मीर खोऱ्य़ातील दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दगडफेकीच्या 66 घटना झाल्या होत्या, तर मार्च महिन्यात अशाप्रकारच्या केवळ 17 घटना घडल्या आहेत. खोऱ्य़ातील लोक नागरी निदर्शनांच्या माध्यमातून स्वतःचा विरोध व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यात अशाप्रकारची 69 निदर्शने झाल्याचे अहवालाद्वारे समजते.
तपास यंत्रणांनी फुटीरवाद्यांवर कारवाई करत हवालाच्या माध्यमातून होणारा वित्तपुरवठा रोखल्याने दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे मानले जात आहे. फुटीरवादी म्होरके सध्या तुरुंगात असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात असल्याने पाकिस्तानातून येणारा पैशांचा ओघ आटला आहे.
दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेदरम्यान लोकांकडून होणाऱ्या निदर्शनांची तीव्रता कमी झाल्याचे सांगण्यात आले. दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्य़ा तरुणांची संख्या घटली असून दहशतवाद्यांची स्थानिक भरती आता केवळ दक्षिण काश्मीरपुरती मर्यादित आहे. खाऱ्यात जानेवारीमध्ये 5, फेबुवारीमध्ये 7 आणि मार्च महिन्यात 6 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला होता. या 6 जणांपैकी 6 जण दक्षिण काश्मीरचे असून एक बांदीपोराचा रहिवासी आहे.
मागील वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये 32 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग निवडला होता. खोऱ्य़ात यंदा आतापर्यंत 68 दहशतवादी मारले गेले आहेत. मार्च महिन्यात 21 दहशतवादी मारले गेले होते, ज्यातील 11 जण जैश-ए-मोहम्मदचे, 5 हिजबुल मुजाहिदीनचे तर 5 जण तोयबाचे होते.