शिवसेनेने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला
कोल्हापूर – खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणे हा देखील एक प्रकारे देशद्रोहच आहे. तसेच शेतकरी कर्जजमाफी हा महाघोटाळाच असून हे सरकार निर्लज्ज आहे. पहारेकरी चोर आहेत. राममंदिर कधी होणार, असे आरोप करणारे शिवसेनेचे उध्दव ठाकरे भाजपसोबतच जाऊन बसले. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ठाकरे यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी जयसिंगपूर येथील आयोजित सभेत केला.
छगन भुजबळ म्हणाले, शेतकऱ्याबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकांसाठी काम करणे त्यांची पध्दत आहे. त्यामुळे जात-पात पाहू नका. लढवय्या नेत्याचे काम पहा. अशा नेतृत्वाला बळ देण्याची गरज असून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टी पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तेचा वापर करुन लोकांच्या मनामध्ये भिती घालण्याचे काम भाजप-शिवसेनेची मंडळी करीत आहेत. मतदारचं त्यांचा समाचार घेणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील बेताल वक्तव्य करुन धमक्या देत आहेत. सोशल मिडियावरील व्हायरल झालेला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहिला तर यामध्ये या निवडणूकीत साम, दाम, दंड, भेद सारख्या नितीचा अवलंब करा, असे ते म्हणत असतील तर ही कसली लोकशाही. जातीपातीचे राजकारण मी कधी केले नाही. काम बघून मला अजूनही लोकवर्गणी येत आहे, हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.