नवी दिल्ली – फलंदाज आणि गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 40 धावांनी पराभव करत आगेकूच केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 168 धावांची मजल मारत दिल्लीसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले. यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या दिल्लीला निर्धारित 20 षटकंत 9 बाद 128 धावांचीचमजल मारता आली.दिल्लीच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉयांनी पहिल्या षटकापासूनच फटकेबाजी करत पॉवर प्लेच्या 6 षटकांमध्ये दिल्लीला 48 धावांची मजल मारुन दिली.
मात्र, सातव्या षटकांत धवन 35 धावा करुन परतल्यावर पृथ्वी देखील केवळ 20 धावा करुन परतला. त्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. यावेळी भरवशाचे ऋषभ पंत आणि कॉलिन मुन्रो अनुक्रमे 7 आणि 3 धावा करुन परतल्याने दिल्लीचा संघ आणखीनच अडचणीत सापडला. लागोपाठ विकेट पडत गेल्याने दिल्लीचा संघ धावगती राखू शकला नाही आणि त्यामुळे त्यांना 20 षटकांत केवळ 128 धावांचीच मजल मारता आली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारे मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकयांनी सार्थ ठरवत चौकार आणि षटकाराची आतषबाजी करत पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये 57 धावांची मजल मारली. मात्र, सातवे षटक टाकायला आलेल्या अमित मिश्राने पहिल्याच चेंडूवर रोहितला बोल्ड करत मुंबईला पहिला धक्का दिला.
तर, यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवला साथीत घेत डी कॉकने फटकेबाजी करत मुंबईची धावगती वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. मात्र, तो 35 धावा करून परतल्यानंतर कृणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईची धावगती वाढवण्यावर भर दिला. यावेळी दोघांनी 13.5 षटकांत मुंबईच्या संघाचे शतक फलकावर लगावले. यावेळी हे दोघे मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत असताना 26 धावा करून सूर्यकुमार यादव परतला.
सूर्यकुमार यादव परतल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला साथीत घेत कृणाल पांड्याने फटकेबाजी केली. यावेळी हार्दिकने 15 चेंडूत 32 तर कृणालने नाबाद 37 धावा करत मुंबईला 168 धावा करून दिल्या.