बिश्केक – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यादरम्यान आज काझकिस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य परिषदेनिमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दोन्ही देशाच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन दरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ होत असल्याचे नमूद करताना भारतामध्ये चीन बँकेच्या शाखेला देण्यात आलेली परवानगी आणि चीनने मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र संघाच्या दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत स्थान मिळावे यासाठी दिलेले मत या घडामोडींवर प्रकाश टाकला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीमध्ये पाकिस्तान विषयावर देखील संक्षिप्त चर्चा करण्यात आल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. पाकिस्तानबाबत चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांना सांगितले की, पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न पाकिस्तानमुळे निष्फळ ठरले आहेत. आता पाकिस्तानला शांततेची चर्चा करायची असेल तर त्यांना त्यासाठी आधी दहशतवादमुक्त वातावरण तयार करणं गरजेचं आहे. मात्र पाकिस्तान त्या दिशेने काम करताना दिसत नसून त्यांनी आता दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी देखील पाकिस्तानबाबत आपली भूमिका मांडताना पाकिस्तानतर्फे दहशतवादी कारवाया सुरु असताना शांतता चर्चा होऊ शकत नाही असं म्हंटल होतं. दरम्यान आजच्या शांघाय सहकार्य परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या समोर देखील पंतप्रधानांनी पाकिस्तानबाबतची भूमिका कायम ठेवली आहे.
FS,Vijay Gokhale in Bishkek: There was a brief discussion on Pakistan. PM recalled that he has made efforts and these efforts have been derailed,that Pak needs to create atmosphere free of terror and at this stage we do not see this happening. We expect it to take concrete action https://t.co/0W17RFFYjL
— ANI (@ANI) June 13, 2019