केदार व कार्तिक यांना वगळणार?
लंडन – विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर या संघातील मधल्या फळीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेळाच्या दृष्टीने प्रौढ असलेल्या केदार जाधव व दिनेश कार्तिक या दोन्ही खेळाडूंना संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.
महेंद्रसिंग धोनी याच्याकडे संघाचे नेतृत्व आल्यानंतर भारताने पुढील दोन वर्षात होणाऱ्या स्पर्धा व मालिकांचा विचार करीत त्यानुसार काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळले होते. आताही त्याप्रमाणेच बदल केले जाणार आहेत. भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय तीन सामने, टी-20 चे तीन सामने व दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे हा दौरा दुसऱ्या फळीतील खेळाडूंच्या कौशल्याची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीला उपयुक्त ठरणार आहे.
यष्टीरक्षक धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले असल्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंत यालाच प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. भारत “अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे संजू सॅमसन याच्याबाबत आशावादी आहे. त्याने स्थानिक सामन्यांमध्ये यष्टीरक्षक व फलंदाज या दोन्ही आघाड्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार, युझवेंद्र चहल यांचे संघातील स्थान निश्चित आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या नवदीह सैनी, खलील अहमद, दीपक चहार, राहुल चहार, मयांक मार्कंडेय, कृणाल पांड्या यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यर, शुभम गिल, मनीष पांडे यांची नावेही चर्चेत आहेत.