लंडन – विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील अशी आशा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने व्यक्त केली आहे. ओव्हलच्या खेळपट्टीवर सराव सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या लढतीत अर्धशतक झळकावणारा जडेजा एकमेव फलंदाज ठरला. फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब नसल्याचे जडेजाने सांगितले.
सामन्यानंतर जडेजा म्हणाला,”इंग्लंडच्या सर्वसाधारण परिस्थितीप्रमाणे येथील स्थिती होती. खेळपट्टीमध्ये सुरुवातीला ओलावा होता. काही तासानंतर खेळपट्टी चांगली होत गेली. विश्वकप स्पर्धेत एवढी हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या मिळणार नाही, अशी आशा आहे. खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतील.’ भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव गोलंदाजांसाठी अनुकूल स्थितीमध्ये 179 धावांत संपुष्टात आला.