-अशोक सुतार
हल्ली मी माझा चेहरा शोधतो आहे. मी पाहात असतो समाजातील अनेक चेहरे आणि मुखवटे. अजूनही अनेक चेहरे मज उमजले नाहीत आणि उमजतील असे वाटत नाही. मुखवटे अनुभवाने, आंतरजागृतीने पाहता येतात. मानव हा एक निसर्गातील सुबुद्ध असलेला प्राणी होय. मानवाच्या चेहऱ्यावरील मुखवटेही सृष्टीतील प्राण्यांच्या भावभावनांचे प्रतीक असावे, असे मला वाटते.
काही माणसे सिंहासारखी शूर असतात तर काही कोल्ह्याची चतुराई घेऊन जन्मास आलेले असतात. चेहरे आणि मुखवटे यांत बरेच अंतर आहे. मुखवटे हे कदाचित फसवे असू शकतात; परंतु चेहरे हा मानवाच्या स्वभावाचा आरसा असतो. आरसा कधी खोटे बोलत नाही, तो स्वभावाचे प्रतिबिंब शतप्रतिशत दाखवतो. कधीकधी मानवाला आरशाचे सत्य स्वरूप पटत नाही.
मानवाच्या, मुखवट्यावर कोणताही भाव असला तरी त्याच्या मनाचा अंदाज लागणे खूप कठीण. अंतर्मनात विचारांची अनेक चक्रे सुरू असतात आणि या विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर दिसून येते. मुखवटे हे फसवे भारी, पण त्यांच्याआड असलेला चेहरा त्याहूनही भिन्न असतो. प्रतिष्ठेचे खोटे मुखवटे परिधान करून समाजात जगणारे अनेक आहेत. मुखवटा अशा लोकांचा आधार बनतो.
मनुष्याचे अंतर्मनातील चांगले विचार मानवाला सांगतात, हे वाईट आहे, करू नकोस; परंतु मानवाच्या मेंदूतील वाईट विचार त्याला बजावून सांगतात, अरे! असे केल्याने काय बिघडणार आहे. करून तर पाहा जमले तर जमले. असा वाईट आणि चांगल्या विचारांचा नेहमीच संघर्ष सुरू असतो. सृष्टीतील सजीव हा संघर्षशील असतो. संघर्षाशिवाय मनुष्याचा विकास नाही आणि प्रगल्भ विचारांशिवाय सच्चा मनुष्य नाही.
व्यक्तीच्या अंतर्मनावर पूर्वसंस्कार, कृत्ये यांचा प्रभाव असतो. त्यामुळे व्यक्तीकडून कधीकधी त्यानुसार बरीवाईट प्रतिक्रिया येते; परंतु प्रज्ञाशील मनुष्य विवेकशक्तीला आवाहन करून विचार व आचारांचे पालन करत आपली प्रज्ञा खुबीने वापरून सुखी जीवन जगत असतो. मानवाला निसर्गातून विविध गोष्टींचे मार्गदर्शन, संकेत मिळतात. दर्याचे तुफान आणि बेभान वारा यांच्यामध्ये सापडलेली होडी आणि होडीवर बसलेला तो नावाडी यांचा मोठा संघर्ष सुरू असतो. तसेच अंतर्मन आणि बाह्य मनाचा संघर्ष नेहमीच सुरू असतो.
वादळ येते, पालापाचोळा उडून जातो. काही घरेही उन्मळून पडतात. पण पक्की घरे शाबूत राहतात. अशावेळी प्रश्न पडतो की, राहिली येथे कशी शाबूत मातीची घरे? वादळांनी घेरलेले गाव हे कुठले बरे ! मानवाच्या चेहऱ्यावर प्रत्येक कृतीचे प्रतिबिंब पडते. परंतु मुखवटे हे मृगजळाप्रमाणे फसवे असतात. मुखवट्यांना भुलून मानव दुसऱ्याशी वर्तन करतो, त्यावेळी त्याची फसगत होते. काहीजण मुखवटे लावतात प्रीतीचे, आश्वासक मैत्रीचे! परंतु मुखवट्यामागील चेहरा मात्र वेगळाच असतो.
मी जेव्हा रात्री घरी परततो त्यावेळी मुखवटे आजूबाजूला इतस्ततः पडलेले दिसतात. काही मुखवटे सुखी, दुःखी, निराश, कुणी संतापलेले असतात. मी मुखवट्यांना विचारतो, एवढे सर्व नाटक करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे? परंतु मुखवटे माझीच समजूत काढतात, तू तर तुझ्या बऱ्या वाईट विचारांतून आमची निर्मिती केलीस. आम्ही तुला सोडून जावे तरी कुठे? हे ऐकताच मी शांत बसतो आणि विचार करू लागतो, मला विवेकशील, सम्यक विचारांची गरज आहे. मला या विचारांनुसार आचरण करून माझे मन आणि मेंदू यांतील वाईट विचारांचा कचरा काढायचा आहे. म्हणजे या मुखवट्यांची गर्दी माझ्या आजूबाजूला फिरकणार नाही. सध्यातरी मी माझ्या उन्नतीसाठी एवढेच करू शकतो. आपणास काय वाटते?