मॅंचेस्टर – आमच्या डावातील पहिल्या पाऊण तासात आम्ही केलेली खराब फलंदाजीच आमच्या पराभवास कारणीभूत ठरली. 240 धाबांचे लक्ष्य अवघड नव्हते. मात्र, त्याबाबत आम्ही गांभीर्याने पाहिले नाही, अर्थात, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही श्रेय द्यायला पाहिजे. त्यांनी आम्हास चुका करण्यास भाग पाडले. अंतिम फेरीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
कोहली याने रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक करीत सांगितले की, जबाबदारीने खेळ करताना आक्रमक खेळ कसा केला पाहिजे याचा त्यांनी प्रत्यय घडविला. त्यांनी एकवेळ अशक्य वाटणारा विजय दृष्टिपथात आणला होता. मात्र, नशिबाची साथ मिळाली नाही.