नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांनंतर सुरू झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारला एक मार्गदर्शिका पाठवली आहे. पश्चिम बंगालमध्ये कायदा अणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात यावी. शांतत आणि सामाजिक सौहार्द जपले जावे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलेल्या या “ऍडव्हायजरी’मध्ये म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भय उत्पन्न होत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही आठवड्यात झालेल्या हिंसक घटनांमुळे तेथे कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच अपयशी ठरल्याचे दिसत आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था, सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालला पाठवलेल्या मार्गदर्शिकेमध्ये म्हटले आहे.