चाळीस हजार लोकांनी दिला पाठिंबा
भोपाळ: नागरी हिताच्या विषयांना सोशल मिडीयाचा वापर करून चालना देण्याचा प्रयत्न आता सुरू झाला असून भोपाळच्या नागरीकांनी भोपाळ शहर हे अधिक चांगल्या विमान सेवेने जोडले जावे यासाठी फेसबुकवरून मोहीम सुरू केली त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बेटर एअर कनेक्टीव्हीटी फॉर भोपाळ यासाठी चालवल्या गेलेल्या या मोहीमेला तब्बल 40 हजार लोकांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 27 जणांनी फेसबुकवर ही मोहीम सुरू केली होती. त्याला चाळीस हजार लोकांनी पाठिंबा देत ही चळवळ उचलून धरली अशी माहिती या ग्रुपच्या प्रशासक प्राची बालुआपुरी यांनी दिली.
त्या म्हणाल्या की आमच्या या मागणीनंतर भोपाळहून पुणे, बंगळुरू, आणि अन्य ठिकाणी विमान सेवा सुरू झाली आहे. त्या म्हणाल्या की या मोहीमेतून विमान प्रवाशांच्या अन्य मागण्याही जोरदार लाऊन धरण्यात आल्या आणि त्याच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला. विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात होते. पण ते पैसेही आता आमच्या दबावामुळे कमी करण्यात आले आहेत. फेसबुक बरोबरच ट्विटरवरही भोपाळ एअर कनेक्टीव्हीटीची मोहींम सुरू करण्यात आली असून त्यालाहीं चांगला प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी म्हटले आहे.