अनेक वर्षांपासून प्रश्न रखडलेलेच : तोडगा निघेना
पुणे – कनिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवेळ रिक्त असलेल्या जागांवर अर्धवेळ शिक्षकांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन अर्धवेळ शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयातील अर्धवेळ शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित पडले आहेत. यावर शासनाला निवेदने देण्यात आली. आंदोलनेही करण्यात आली. प्रश्न मात्र सुटलेच नाहीत. अर्धवेळ शिक्षक विविध संघटनांमध्येही सहभागी झाले होते. मात्र या शिक्षकांना स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची आवश्यकता जाणवू लागली होती. अखेर अर्धवेळ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या शिक्षकांची नव्याने संघटना स्थापन करण्यात आली आहे.
राज्यात पूर्णवेळ शिक्षकांच्या 6 हजार जागा रिक्त आहेत. अर्धवेळ शिक्षकांची संख्या 5 हजार आहे. या अर्धवेळ शिक्षकांना नियमित दरमहा वेतन मिळत नाही. दरवर्षी शिक्षक मान्यता मिळाल्यानंतचर वेतन देण्याची पद्धत राबविण्यात येत असल्याने या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे, अशा व्यथा शिक्षकांकडून मांडण्यात येत आहेत. शासनाच्या शिक्षण विभागाकडे वारंवार प्रश्न मांडून त्यावर लवकर निर्णय होत नसल्याबाबत शिक्षकांकडून अनेकदा संतापही व्यक्त करण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष संपण्याआधी अर्धवेळ शिक्षकांना मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे, पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे सेवेची शाश्वती मिळावी, नैमित्तिक रजा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.