कराड -कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समिती डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली गेली 7 वर्षे लढा देत आहे. परंतु त्यांना अद्याप विमानतळ विस्तारवाढ रद्द करता आलेली नाही. याउलट त्यांनी विस्तारीकरणाचे काम रखडवले होते. ते आज पूर्णत्वाच्या मार्गावर असल्यामुळे त्यांनी या लढ्यात भाग घेवू नये, असा इशारा वारूंजी, केसे, मुंढे येथील बाधीत शेतकऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, डॉ. पाटणकरांनी अनेकदा बैठका घेतल्या. मोर्चे, आंदोलने, महाआंदोलने आदी प्रकारची नाटकी केली. त्यामुळे आम्हीही त्यांच्या लढ्यात सामील होऊन त्यांना साथ दिली. मात्र, त्यांना हे विमानतळ विस्तारवाढ रद्द करता आली नाही. त्यांच्या समितीच्या लोकांनी वारूंजी, केसे, मुंढे या गावातील शेतकऱ्यांना वेठीस धरले.
गावात टेप धरुन मापे टाकून संपूर्ण वारूंजी गाव विमानतळ विस्तारीकरणात जात असल्याचे भासवले. त्यामुळे लोकांना बायका, पोर घेवून रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना विस्तारवाढ रद्द करायची होती तर पुनर्वसन कलम 11 ते 13 लागू करण्याबाबत शासनाला का कळविले.
आज 70 टक्के शेतकरी शासनाने चालू बाजारभावाने दर आणि पुनर्वसन पॅकेज दिल्यास जमिनी द्यायला तयार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी पाटणकरांनी शासनाशी वाटाघाटी कराव्यात. शासनाने भैरवनाथ पाणी पुरवठा नवीन स्कीमसाठी 8.5 कोटी मंजूर केले असून लोकांच्या घरांची भरपाई देवून मगच शासन विस्तारवाढ करणार आहे.
त्यामुळे बाधित शेतकरी तुमच्याकडे यायला तयार नाहीत. त्यामुळे विमानतळ विस्तारवाढीसंदर्भात डॉ. पाटणकरांनी भाग घेवू नये, असेही पत्रकात नमूद केले आहे.