ना. राम शिंदे : बिले सादर करण्यात छावणी चालकांची उदासीनता
प्रलंबित बिले सादर करण्याचे आवाहन
नगर – जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे बिले जिल्हा प्रशासन आणि तालुकास्तरावर प्राप्त होत आहेत, ती तात्काळ अदा केली जात आहेत. जिल्हा प्रशासनाने 15 एप्रिलपर्यंत 44 कोटी 4 लाख रुपये छावणीचालकांना वर्ग केले आहेत. याशिवाय, 16 एप्रिल ते 31 मे या कालावधीत 513 चारा छावण्यांपैकी 204 छावणीचालकांना पन्नास टक्के रक्कम म्हणजे 16 कोटी 84 लाख 74 हजार 342 रुपये दिले आहेत. राज्य शासनाकडे निधी आहे, मात्र चारा छावणीचालकांनी प्रलंबित बिले लवकरात लवकर सादर करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील टॅंकर संख्या, सध्या सुरु असलेले टॅंकर्स, जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या, काही भागात पाऊस झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या छावण्या, अद्यापही सुरु असलेल्या छावण्या, चारा छावणीचालकांना देण्यात आलेले अनुदान आदींचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एकूण 436 छावण्या सुरु होत्या. या छावण्यांना पहिला व दुसरा हप्ता अनुक्रमे 23 कोटी 80 लाख रुपये आणि 11 कोटी 90 लाख रुपये इतका वर्ग करण्यात आला आहे. तिसरा हप्ता अदा करण्यात आलेल्या छावण्यांची संख्या 256 इतकी असून 8 कोटी 37 लाख 4 हजार सातशे इतकी रक्कम चारा छावणीचालकांना प्रदान करण्यात आली आहे, असे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले. तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रलंबित असलेली बिलेही मार्गी लावण्यात येत आहेत, मात्र, अद्यापही चारा छावणीचालकांनी त्यांची बिले प्रशासनाकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांची देयके मिळण्यास उशीर होऊ शकतो, याची जाणीव ठेवून त्यांनी बिले वेळेत सादर करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
दि. 15 एप्रिलअखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे तहसीलकडून 358 छावण्यांची बिले प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 256 देयके कोषागारात सादर करण्यात आली असून, येत्या दोन-तीन दिवसात या चारा छावणीचालकांना ते अनुदान वर्ग होईल. सध्या केवळ 51 बिले जिल्हा प्रशासनाकडे प्रशासकीय कार्यवाहीस्तव बाकी आहेत.16 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील एकूण 513 छावण्यापैंकी जिल्हाधिकारी कार्यालयास केवळ 310 छावण्यांची बिले प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 204 छावण्यांची 17 कोटी 50 लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. उर्वरित 213 छावण्यांनी अद्याप बिले सादर करण्यातच उदासीनता दाखविली असल्याचे दिसते.