गरजेनुसार आणखी टॅंकर वाढविण्याच्या हालचाली
सर्वाधिक टॅंकर संख्या बारामती तालुक्यात
पुणे – जिल्ह्यातील दुष्काळाची झळ अधिक तीव्र होत असून, टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तब्बल 207 टॅंकरद्वारे 12 तालुक्यांमधील सव्वातीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी दररोज गाव, वाड्या-वस्त्यांवर टॅंकरच्या 466 फेऱ्या सुरू असून, आवश्यकतेनुसार आणखी टॅंकर आणि फेऱ्या वाढविण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
एप्रिलमधील कडक उन्हाने जिल्ह्यातील पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, ठिकठिकाणी पाहणी करून विहिरी, बोअर घेण्याचे काम सुरू आहे. मागील सहा वर्षांत सर्वाधिक टॅंकरची संख्या 250 पर्यंत गेली आहे. यंदा सद्यस्थितीत टॅंकरची संख्या पाहता पुढील पंधरा दिवसांत सर्वाधिक टॅंकरचे रेकॉर्ड मोडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक टॅंकर बारामती तालुक्यात असून, त्यापाठोपाठ शिरूर, पुरंदर, दौंड आणि आंबेगाव तालुक्यांतही टॅंकरची संख्या अधिक आहे.
बारामतीमध्ये 25 पुरस्कृत टॅंकर
बारामती तालुक्यात सर्वाधिक टॅंकरची संख्या असून, 37 टॅंकरद्वारे 21 गावे आणि 316 वाड्या-वस्त्यांमधील 69 हजार 869 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी तब्बल 108 टॅंकरच्या फेऱ्या सुरू असूनही अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. गाव, वाड्या वस्त्या लांब असल्यामुळे टॅंकरच्या फेऱ्या पूर्ण करण्यात चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे प्रशासनाला हातभार म्हणून काही दानशुर व्यक्तींकडून टॅंकर देण्यात येत आहे. बारामतीमध्ये 27 पुरस्कृत टॅंकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.