पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना : आषाढीवारीच्या पूर्वतयारीची बैठक
पुणे – पंढरपूरची आषाढीवारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. हा आनंद सोहळा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी. पाण्याचे टॅंकर आवश्यक त्या ठिकाणी पुरविण्यात यावे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना बापट यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
विधानभवन येथे आषाढीवारी पूर्व तयारीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊखोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध विभागाचे अधिकारी, आळंदी संस्थान प्रमुख ऍड विकास ढगे, संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व विविध पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.
बापट म्हणाले, दरवर्षीप्रमाणे हा सोहळा यावर्षीही उत्साहात साजरा व्हावा. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमाणेच अन्य पालख्यांची सोय चांगल्याप्रमाणे करावी. कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. आळंदी देहू मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करून घ्यावे. पालखी महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुरत्या स्वरुपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व विजेची सोय करण्यात यावी.
पोलिसांनी सतर्क राहावे
वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उद्भव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.