दिलीप गांधी ः स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपच्या वतीने अभिवादन
नगर – भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून ज्यांनी तन-मन-धनाने पक्ष वाढविला, असे स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर भारतीय जनता पार्टीला देशात मिळालेल्या या मोठ्या यशाचा सर्वात जास्त आनंद झाला असता. त्यांनी कष्टकरून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे पाळेमुळे रोवले, त्यामुळेच देशात व राज्यात आज पक्ष सुवर्णदिवस पाहत आहे. नगरला ते मावशी मानत त्यामुळे नगरशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. अशा महान लोकनेत्याला श्रद्धांजली वाहताना मन भरून येत आहे. सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. गोपिनाथ मुंडेंच्या विचारसरणीवर चालून पक्षाचे काम करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप गांधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक भैय्या गंधे, रवींद्र बारस्कर, मनोज दुलम, सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, किशोर डागवाले, दामोदर माखीजा, जगन्नाथ निंबाळकर, नरेंद्र कुलकर्णी, वसंत राठोड, शुभांगी साठे, नाना भोरे, संजय ढोणे, महेश सब्बन, तुषार पोटे, सागर गोरे, सुजित खरमाळे, बाबासाहेब भिंगारदिवे, दिनेश कटारिया, जालिंदर शिंदे, लक्ष्मीकांत तिवारी, मिलिंद भालसिंग, कैलास गर्जे, बंटी ढापसे, उमेश साठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांनी सर्वसामान्य जनतेला आधार व न्याय दिला. सर्वसामान्य जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांपर्यंत पक्ष वाढविला. त्यांनी केलेल्या कामांमुळेच आज पक्षाला एवढे मोठे यश प्राप्त झाले आहे, अशा महान लोकनेत्याला महानगरपालिकेच्यावतीने श्रद्धांजली. यावेळी प्रास्तविक वसंत राठोड यांनी केले तर आभार किशोर डागवाले यांनी मानले.