विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता
जोगवडी- महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने भोर तालुक्यातील पांगारी व कुरुंजी गाव येथील दोन्ही आश्रमशाळा बंद करण्यात आल्या आहेत. या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे इतर शाळेमध्ये प्रवेश घेण्याचे आदेश दिले आहेत. इतर शाळा जास्त अंतरावर असल्याने पालकांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात की काय अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुलांची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी व याचा फायदा सर्वांना व्हावा या उद्देशाने 1972-73 साली शासनाने आदिवासी शाळा सुरू केल्या होत्या. भोर तालुक्यातील पूर्व भाग व हायवे पट्टा वगळता इतर भाग डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनुसूचित जमातीतील व इतर आर्थिकदृष्ट्या मागासलेली मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तालुक्यात 1972 साली भाटघर धरणाच्या उत्तर बाजूस कुरुंजी व धरणाच्या दक्षिण बाजूस पांगारी या गावात आदिवासी शाळा सुरू केल्या होत्या. शाळेमध्ये शिक्षण, राहणे, भोजनाची व्यवस्था केली जात होती. तसेच शैक्षणिक साहित्य देखील मोफत पुरविले जात होते.
आजपर्यंत या शाळांत हजारो मुला-मुलींनी शिक्षण घेतले असून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी व व्यवसाय करीत आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास झालेला आहे. परंतु, शासनाने 23 जानेवारी 2019 रोजी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या शाळेमध्ये आदिवासी मुले व इतर समाजातील मुलेही शिक्षण घेत होते. शासनाच्या निर्णयामुळे या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार झाला आहे. या भागात रोजगाराचीही गंभीर समस्या असून या मुलांच्या पालकांची परिस्थिती हलाखीची आहे. मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते की काय अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
पांगरी व कुरुंजी आश्रमशाळेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेत होते. पांगारी आश्रमशाळा बंद झाल्याने सांगवी व साळुंगण या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर वेळवंड गावातील शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर कुरुंजी आश्रमशाळा बंद झाल्याने शेजारील गावातील शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे, अशी माहिती कुरुंजी गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी दिली. परंतु, या भागात अति पर्जन्यवृष्टी होत असल्याने शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. एसटीची सोयही मर्यादित आहे. छोट्या मुलांना एसटीने प्रवास करणे शक्य नसल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे.
- आमच्या गावातील आश्रमशाळा बंद झाल्याने सदर मुलांचे प्रवेश दुसऱ्या गावातील शाळेत घेण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. दुसऱ्या गावात प्रवेश घेतल्यास मुलांना एसटीतून ने-आण करणे शक्य नाही. आम्ही मोलमजुरी करायची की मुलांना ने-आण करायचे असा प्रश्न पडला आहे. आश्रमशाळा बंद झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील की काय? अशी भीती वाटत आहे.
– ज्ञानेश्वर नलावडे, माजी सरपंच कुरुंजी गाव