जि. प. अध्यक्षांची गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांना सूचना : सरकारकडून 1 कोटी 59 लाखांचा निधी
पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आनंदात आणि स्वच्छतापूर्ण पार पाडण्यासाठी सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी काटेकोर नियोजन करावे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाणी, शौचालय, वीजपुरवठा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच पालखीतळ आणि परिसराची स्वच्छता करून घ्यावी. तसेच यावर्षी राज्य शासनाकडून 1 कोटी 59 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दि. 24 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान दि. 25 जून रोजी आळंदी येथून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, अमर माने, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह संत सोपान महाराज, संत गोरा कुंभार आणि संत निळोबाराय पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो. या सोहळ्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी शौचालय, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, निवारा, वीजपुरवठा, रस्ते, वाहतूक आदी मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेकडूनही शौचालय, पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा देण्यात येते. यावर्षी राज्य शासनाकडून 1 कोटी 59 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी तालुकास्तरावर पाठविण्यात येणार असून गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी दिले. तसेच अधिकाऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या तत्काळ वरिष्ठांना कळवाव्यात. मात्र, कामात कोणताही निष्काळजीपणा होऊ नये, असेही गावडे यांनी सांगितले.