प्रभात इफेक्ट
प्रभातच्या वृत्तानंतर अखेर दुभाजकांचे काम पुन्हा सुरू
सासवड- सासवड शहरातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरील दुभाजक बसविण्याचे काम गेल्या तब्बल 15 दिवसांपासून बंद असल्याचे वृत्त दैनिक प्रभातमध्ये (दि. 8) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. सोमवार (दि.13) सकाळी दुभाजकाच्या कामास सुरुवात झाली. मात्र, कामाच्या दर्जाबाबत साशंकताही कायमच आहे. यात दर्जा सुधारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
दैनिक प्रभातने पुणे- पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरील सासवड शहरात बसविण्यात येणाऱ्या रस्ते दुभाजकांच्या कामाबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. पंधरा दिवसांपासून काम बंद असताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अनभिज्ञ अधिकाऱ्यांनाही याबाबत जाब विचारला होता. त्यांना या परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. सासवड शहरासह संपूर्ण तालुक्यातील आणि राज्यभरातून महामार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने “प्रभात’ने सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. याबाबत सडेतोड आवाज उठवला होता. सातत्यपूर्ण वृत्तानंतर अखेर प्रशासनाने याची दखल घेतली. त्यामुळे झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली. सासवड शहरातील बसस्थानकासमोरील ज्या ठिकाणी कॉंक्रीटीकरणासाठी सांगाडा लावलेला होता. त्यावेळी प्रभातदे सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी रातोरात घाईघाईने कॉंक्रीट मिक्सर आणून त्याच्यामध्ये कॉंक्रीट ओतण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासातच सांगाडा काढण्यात आला. जेव्हा सांगाडा काढला. त्यावेळी पंधरा दिवसापूर्वीचा अर्धा दुभाजक तयार झालेला होता. त्यावर नुकतेच टाकलेले कॉंक्रीटचे दुभाजक किती दिवस टिकाव धरणार, याबाबत नागरिकांमधून साशंकता आहे. प्रशासनाच्या घाईमुळे कामाचा दर्जा वारंवार अधोरेखित होत आहे.
- रंगकामातून निकृष्ट कामांवर झालर
मुळातच अतिशय संथगतीने आणि निकृष्ट दर्जाच्या कामात एक नवीन शक्कल संबंधित कंत्राटदाराने शोधून काढली आहे. सकाळी कॉंक्रीट टाकायचे, दुपारी सांगाडा काढायचा आणि संध्याकाळी त्यावर पांढऱ्या रंगाचा चुना मारायचा, ही मलमपट्टी दिवसाढवळ्या सुरू आहे. नेमके काम व कामाचा दर्जा हेच कुणाला समजून नये, यासाठी खटाटोप सुरू झाला आहे. पांढऱ्या रंगाखाली काळा कारभार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाकण्याचा कंत्राटदाराने डाव रचलेला आहे. ही नागरिकांची भेसळ फसवणूक आहे. शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. याबाबत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहे. प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे, हा मूळ प्रश्न आता निर्माण झाला आहे. - काम तर चालू पण दर्जाजे काय?
दुभाजकांचे काम अखेर सुरू झाले आहे. पण या कामाच्या दर्जाबाबत मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कामाच्या दर्जाची तपासणी आजपर्यंत झाली आहे का? आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे आहे का? तपासणी केली जाते का, हे प्रशासनाकडून जाहीर करणे अपेक्षित आहे. कारण निधी आला म्हणजे कसेही रडतखडत किंवा घाईगर्दीने काम करणे इतकाच हेतू त्यामागे असतो. मात्र, ते काम किती दिवस टिकेल, याची खातरजमा केली जात नाही. मात्र, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना याचा विसरच पडलेला आहे.