पेठ-आज ग्रामीण भागामध्ये आणि जवळपास शहरी भागामध्ये लहान मुलांमध्ये मैदानी खेळापेक्षा मोबाईलमध्ये जास्त रममाण झालेली दिसतात. मानवाच्या संदेशासाठी, दळणवळणासाठी तयार केलेला मोबाईल, हातावरचे मनगटी घड्याळ, कॅमेरा, कॅल्क्यूलेटर, एफएम रेडिओ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांचे मैदानी खेळ कधी गायब झाले कुणाला कळलेच नाही.
आजची तरुण पिढी भरकटतेय कारण आता समाजात वातावरणचं तसं झालंय. मागील काही वर्षात तरुण पिढीला आपण ताकदवान अन् धडधाकट दिसावं असे वाटते. पण आता स्लीम बॉडीच वेड लागलयं याला कारणीभूत कोण? ज्या चांगल्या गोष्टी त्या नाही घेत. गावच्या यात्रेत कधी आखाडा पाहायला जाणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. कुस्तीसारखा मैदानी खेळही आज मागे पडत चालला आहे. आधुनिकीकरण, बदल आपण स्वीकारत असतानाच जुन्या चांगल्या गोष्टी आपण मुलांकडून करवून घेतल्या पाहिजे. लहान मूल रडू नये म्हणून त्याच्या हातात दिलेला स्मार्टफोन मुलांच्या डोळ्यावर किती परिणाम करत असेल? याचा विचार होणे गरजेचे.
- हे खेळ पुन्हा शिकवा
संगणकीय खेळ, व्हिडीओ गेम्स आणि मोबाइल ऍप्स व कार्टून मालिकांनी भारतीय बालमनावर गारूड केले असताना “जुने ते सोने’ या गोष्टी प्रमाणे या खेळाची आवश्यकता मुलाच्या विकासासाठी पुन्हा भासू लागली आहे. पकडापकडी, लपाछपी, विटी-दांडू, डब्बा ऐसपैस, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात-मळ्यात, संत्रा-लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, आट्यापाट्या, रुमाल उडवी, पतंगबाजी, चाकाची चक्री, आबाधुबी, खांब पकडी, सागरगोटे, अटक मटक अशा पारंपरिक खेळांचा समावेश असून प्राचीन काळातील मोक्षपट, चल्लसआठ, बागचाल, सातगोल, चौपर आदी खेळाची ओळख नव्याने करुन देण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घेणे गरजेचे आहे.