नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. कारण या गोंधळात रोज नवनवीन नाट्य घडताना पहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीवरून राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चांना खुद्द शरद पवार यांनी पुर्णविराम दिला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकसूत्री कार्यक्रमासाठी कोणतीही बैठक झाली नसल्याचे धक्कादायक वक्तव्य देखील पवारांनी यावेळी केले. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सोनिया गांधीसोबत झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि आघाडीतील मित्रपक्षांबाबत बोलणे झाले. राज्यात कुणासोबत सरकार स्थापन करण्याबाबत आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही अद्याप सरकार स्थापनेसाठी कोणासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आम्ही निवडणूक लढलो. काही अन्य पक्षही आमच्यासोबत होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मित्रपक्ष नाराज करणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्तास्थापन करणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय समितीची बैठक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या बैठकीत एकसूत्री कार्यक्रमाचा मसूदा पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला असून तिन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र शरद पवारांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसंदर्भात कोणत्याही हालचाली सुरु नसल्याचे स्पष्ट करत सर्वांनाच धक्का दिला आहे.