सुभाष कदम
शिराळा – महापूर, अतिवृष्टी, परतीचा पाऊस, राजकीय नेत्यांची उदासीनता यामध्ये शिराळा तालुक्याबरोबरच सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. ऊस पिकाची कोट्यवधींचे नुकसान झालेले आहे. साखर कारखान्यांना ऊसासाठी धावपळ करावी लागणार आहे. ऊस पीक कर्जे माफ करावीत, अशी मागणी होत असून सांगली जिल्ह्याला 15 लाख टन ऊस तुटवडा जाणवण्याची शक्यता वाढली आहे.
शिराळा तालुक्यातील एक हजार हेक्टरमधील ऊस शेती शंभर टक्के बाधित झाली आहे. ऊस पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झालेले असून 800 हेक्टर ऊसाला फटका बसला आहे. कोटींच्या घरात म्हणजे शंभर कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समजते. कारखान्यांचा गळीत हंगाम फारतर फक्त तीनच महिने चालण्याची शक्यता आहे. विश्वास व दालमिया साखर कारखान्यांचा हंगामसुद्धा तीनच महिन्यात बंद करावा लागणार आहे.
वारणा, मोरणा काठ व शिराळा तालुक्यातील ऊस शेतीचे महापूर व अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. शिराळा तालुक्यातील मनदूर, सोनवडे, आरळा, गली, नाठवडे, मोहरी, कोकरूड, सागाव, चिखली, कांदे, मांगले, देववाडी या गावातील शेतीला पुराचा फटका बसला आहे. शिराळा तालुक्यातील 91, शाहूवाडी तालुक्यातील 138, बाहेरील 118 गावांतील ऊस विश्वास व दालमिया कारखान्याकडे गाळपासाठी येतो. यावर्षी सतत मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने ऊस पिके कुजून गेली आहेत. वाढ खुंटली आहे. ऊसाच्या कमतरतेमुळे हंगाम कमी कालावधीत चालणार आहे. त्याचा फटका ऊस वाहतूकदार, ट्रॅक्टर, बैलगाडी वाहतूकदार, हंगामी कामगार ऊसतोडणी मजूर, यांना बसणार आहे.
सांगली जिल्ह्यात पंधरा लाख टन ऊसाचा तुटवडा जाणवेल असा अंदाज आहे. यंदा ऊसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने साखर हंगामाच्या वेळापत्रकाचे गणित कोलमडले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले नसल्याने हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीची बैठकही झालेली नाही. शेतात पाणी असल्याने हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतील.
महापूर व अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. कृष्णा, वारणा, मोरणा नदी काठावरील ऊस पाण्याने कुजून गेला. बहुतांश शेतकरी चाऱ्यासाठी खराब उस वापरत आहेत. ऊसाची उपलब्धता कमी असल्याने ऊस पळवापळवीला जोर येणार आहे. सर्वसाधारण हीच स्थिती सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात असणार आहे. ऊस पीक कर्जे माफ करावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राजकीय नेतेमंडळी सत्तेच्या चढाओढीत गुंतले आहेत. शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली राहिलेला नाही. त्यांची नेहमीसारखीच फरफट सुरू आहे. अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणेही अद्याप भागविलेली नाहीत. महापूर, अतिवृष्टी, राजकीय उदासीनता व निसर्गाचे चमत्कार यामध्ये शेतकरी मात्र पूर्णपणे पिळवटून गेलेला आहे. त्यासाठी संपूर्ण ऊस पीक कर्ज माफ करावीत अशी मागणी होत आहे.