– मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे तोडणास विरोध करणारे पर्यावरणप्रेमी तसेच कोकणातील नाणार रिफायनी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आता भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घेव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील कोणत्याही आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांच्या केसेस तपासून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ व जयंत पाटील उपस्थित होते. कोरेगाव-भिमा येथील विजयास्तंभाला मानवंदना देऊन घरी परतणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष पद्धतीने हल्ला करण्यात आला. या हल्लयात अनेक दलित महिला, ज्येष्ठ नागरीक, तरण, विद्यार्थी जखमी झाले होते. या हिंसाचारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता.
या प्रकारचा निषेध करण्यासाठी राज्यभरात दलित समाज रस्त्यावर उतरला होता. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरूणांवर, महिलांवर पोलिसांनी खोटेनाटे गुन्हे दाखल केले आहेत. खटल्यांचा ससेमीरा मागे लावून तरूणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला असल्याचा आरोप गजभिये यांनी पत्रात केला आहे.
आता आघाडीचे सरकार आले असून हजारो तरूणांवर द्वेषपूर्ण पद्धतीने केलेला अन्याय मुख्यमंत्री म्हणून आपण दूर करावा, तसेच तत्कालीन फडणवीस सरकारने केलेली चूक आपण दूरूस्त करावी, अशी मागणी करतानाच इंदू मील प्रकरणी दलित जनतेवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि त्यांना न्याय द्यावा, अशी विनंतीही गजभिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील कोणत्याही आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांच्या केसेस तपासून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, असे गजभिये यांनी सांगितले.