पुणे – राज्यात सुरू असलेल्या पशुगणनेच्या कामाला एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 30 एप्रिलपर्यंत पशुगणना पूर्ण करावे, असा सूचना राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या मुदतीमध्येतरी पशुगणना पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यामध्ये शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कोंबडी, बदके व इतर सर्व पशुंची जनगणना केली जाते. त्यानुसार जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2018 पासून 20 व्या पशुगणनेला सुरुवात झाली असून, फेब्रुवारी 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य होते. परंतु, पशुसंवर्धन विभागाच्या कामाची गती पाहाता नेहमीप्रमाणे पशुगणना निम्मीही झाली नाही. त्यामुळे दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यातही पशुसंवर्धन विभागाने आचारसंहितेचे कारण पुढे करत मुदतीमध्ये काम पूर्ण केले नाही. पुणे जिल्ह्यातील 9 लाख कुटुंबांतील पशुगणना राहिली असून, पशुगणनेमध्ये पुणे जिल्ह्याचा राज्यात 15 वा क्रमांक आहे. पशुगणनेच्या सुरुवातीला अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे काम संथ गतीने सुरू होते. त्यानंतर सॉप्टवेअर बदलण्यात आले आणि डिसेंबर महिन्यापासून पुन्हा नव्याने पशुगणना सुरू करण्यात आली.