जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांना विश्वास : शिनोली येथे प्रचारार्थ सभा
पेठ – शिवाजीराव आढळराव हे ज्येष्ठ खासदार आहेत, त्यामुळे मी खात्रीने सांगतो की, भविष्यात केंद्रात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. मी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर उद्धवजींनी मला मंत्री केले. आज मी पुरंदर तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकतो आहे. गुंजवणी धरणाचे मोठे काम केले आहे. उद्या आढळराव पाटील यांना ही संधी मिळाल्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे चित्र पालटून जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग केंद्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आढळराव यांना निवडून द्यायचे की, डॉ. कोल्हेंच्या रुपाने साधा खासदार निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवा, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले.
शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, जिल्हाप्रमुख राम गावडे, कल्पना आढळराव, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्या शितल तोडकर, सुरेश भोर, संजय थोरात, संदीप बाणखेले, ताराचंद कराळे, अरूण गिरे, रविंद्र करंजखेले, सुनिल बाणखेले, प्रज्ञा भोर, अशोक बाजारे, दिलीप पवळे आदी उपस्थित होते.
खासदार आढळराव म्हणाले की, 15 वर्षांत मी एक रूपयाचा भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर एकही डाग नाही. सतत लोकांच्या संपर्कात राहिलो. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गाव, वाडीवस्ती फिरलो. प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक तरी विकासकाम मी केले आहे. जनतेच्या सेवेत मी कुठेच कमी पडलो नाही, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
- आघाडी सरकारमुळेच बैलगाडा शर्यती बंद पडल्या. शर्यतबंदीचे पाप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवडणुका आल्यावर कळवळा आला आहे. सुरुवातीपासून मी बैलगाडा शर्यतींच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. सध्या सुप्रीम न्यायालयात ही खटला पूर्ण बेंचसमोर आहे. येत्या काही महिन्यात त्याची अंतिम सुनावणी झाल्यानंतर बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील याची मला खात्री आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार