शरद पवार यांचा पुण्यातील पत्रकार परिषदेत दावा
बारामती- दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या अडचणीत आलेल्या साखर कारखान्याला मदतीचा हात देऊन त्यांच्या कुटुंबाची इच्छा असो नसो त्यांना बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवायला लावल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. दरम्यान, भाजपने चालवलेल्या दबाव तंत्राला कुल कुटुंब बळी पडल्याचा अप्रत्यक्ष आरोप शरद पवार यांनी केला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पुणे येथे शरद पवार यांनी रविवारी (दि. 28) पत्रकार परिषद घेत वरील दावा केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार म्हणाले की, राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. कारखान्याचा एनपीए अधिक आहे. त्यांना नवीन कर्ज देण्यात अडचणी आहेत. असे असताना राज्य सरकारने त्यांना अनेकदा आर्थिक मदत केली असल्यानेच कुल कुटुंबाला इच्छेविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी लागली असल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपच्या वतीने निवडणुकीत उतरविण्यात आले होते. कांचन कुल या पवार कुटुंबाच्या नातेवाईक आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांनीच 2005 मध्ये राहुल आणि कांचन यांचे लग्न जमविले होते. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सख्खे चुलत बंधु आहेत. त्यामुळे बारामतीमधून त्यांच्याच नात्यातील उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र, भाजपाचा हा डाव फसला. सुप्रिया सुळे यांनी सुमारे दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविल्याचे त्यांनी नमूद केले.