सातारा -केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने सातारा जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचा 50 लाख रुपयांचा पुरस्कार दिला. खटाव आणि इंजबाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी आठ लाख, ओझर्डे ग्रामपंचायतीला नानाजी देशमुख पुरस्कार, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना देश आणि राज्य पातळीवर मिळालेल्या पुरस्कारांमुळे जिल्हा परिषदेचा नावलौकिक देशभर पोहोचला आहे.
पदाधिकारी, अधिकारी यांच्या टीमवर्कचे हे यश आहे. जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र शासनाने 2015-16 मध्ये देशातील सर्व पंचायत राज संस्थांसाठी केंद्र स्तरावरून पंचायत राज सशक्तीकरण, राष्ट्रीय ग्राम गौरव पुरस्कार व मनरेगा पुरस्कार प्रतियोगिता सुरु केली. यासाठी पंचायत राजच्या तिन्ही स्तरावर 100 गुणांची प्रश्नावली तयार केली. त्या अनुषंगाने ऑनलाईन प्रश्नावली भरून केंद्र शासनास नामांकने सादर केली जातात. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कामकाज, सभेबाबतचे कामकाज, स्त्री सदस्यांची टक्केवारी, सदस्यांची उपस्थिती, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, चर्चासत्रात घेतलेला सहभाग, जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन, जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग चांगला करणे या बाबीकरिता 100 गुण धरुन पात्रता ठरविण्यात येते. यामध्ये सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली.
माण तालुक्यातील इंजबाव व खटाव या दोन ग्रामपंचायतींनी चांगले कामकाज केले. इंजबाव ग्रामपंचायत राज्यात 14 क्रमांकावर तर खटाव ग्रामपंचायत राज्यात 8 व्या क्रमांकावर आल्याचे कबुले व विधाते यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी अमर मोहिते आणि प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी विशाल क्षीरसागर यांची राज्य सेवा परीक्षेत पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
टीमवर्कमुळे मिळाले विविध पुरस्कार
जिल्हा परिषदेकडील एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून अंगणवाडीमधील मुलांना पोषण आहार अंतर्गत “सीबीई’साठी चांगले काम केल्याने जिल्हा प्रथम क्रमाकांवर आला. पशुसंवर्धन विभाग जनावरांना औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, जन्मलेली वासरे, वांझ तपासणी, एकदिवशीय कोंबडी पिल्ले वाटप, नमुने तपासणी या तांत्रिक कामासाठी जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, मनोज ससे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या टीमवर्कमुळे विविध पुरस्कार मिळून देशभरात नावलौकिक झाल्याचे कबुले व विधाते यांनी सांगितले.