पुणे – जिल्ह्यात कामानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात काही नागरिक स्थलांतरित होऊन आले आहेत. त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेअंतर्गत इतर जिल्ह्यांतील नागरिकांना धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तत्काळ सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून लॉकडाऊन काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शरद भोजन योजना सुरू केली. त्याद्वारे दिव्यांगांना घरपहोच जेवण देण्यात येत आहे. आता याच योजनेअंतर्गत इतर जिल्ह्यांतून तात्पुरत्या स्वरुपात पुणे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांना पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांच्याकडून लाभार्थ्यांचे रेशन संपले आहे का, त्यांची रेशन खरेदी करण्याची परिस्थिती आहे का, ते इतर योजनेत रेशन मिळण्यासाठी पात्र आहेत का, तो गावातील तात्पुरता रहिवासी आहे का याची सर्वेक्षण करून पाहणी होणार आहे.
योग्य व्यक्तीलाच मिळणार लाभ
योग्य व्यक्तीलाच लाभ मिळावा कुठल्याही चुकीच्या व्यक्तीने याचा गैरफायदा घेऊ नये त्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी रेशन दुकानदाराकडील यादी तपासून पाहिली जाणार आहे. याशिवाय, सर्वेक्षण करताना संपूर्ण कुटुंबांचा फोटो घेऊन तो अर्जासोबत जोडला जाणार आहे.