पुण्यातील कृषिदुतांचे भावडीत प्रात्यक्षिक : शेतमाल साठविण्यास फायदेशीर
पेठ – शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेली ताजी फळे, फुले व दुभत्या पाळीव जनावरांचे दूध अंगभूत दमटपणामुळे खराब होते. या वस्तू थंड स्थितीत साठविण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा झिरो एनर्जी कूल चेंबर कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना भावडी (ता. आंबेगाव) देण्यात आले.
कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदुतांनी करून दाखविले. याप्रसंगी शेतकरी गुलाबराव कातळे, शरद कातळे, रामचंद्र सुकाळे, सुनिल नवले, लहुनाथ कातळे, अनिता नवले, सुभद्रा कातळे, अनिता कातळे आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व दूध काढणीनंतर ते थंड राहावे, यासाठी घ्याव्या लागणाऱ्या काळजी व शेती व्यवस्थापनातील एक भाग म्हणून घरगुती शून्य ऊर्जाशित कक्ष कसे तयार करावे, याविषयी पुणे येथील कृषीदूत आकाश मांडे, मयूर दाणे, अवधूत धुमाळ, अनिकेत राहणे, सौरभ वाघमळे, धनंजय बारवकर यांनी भावडी व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थआदी थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष म्हणजेच झिरो एनर्जी कूल चेंबर हा एक चांगला व कमी खर्चाचा पर्याय आहे. हा शीत-कक्ष शेतावरच उभारता येतो व ताजी फळे, फुले व भाज्या त्यात साठवून बाजारात नेईपर्यंत चांगल्या अवस्थेत ठेवता येतात. अंगभूत दमटपणामुळे फळे व भाज्या फार लवकर खराब होतात. शिवाय ह्या सर्व जिवंत वनस्पती असल्याने तोडणीनंतरही त्यांची पिकण्याची तसेच बाष्प बाहेर टाकण्याची क्रिया चालूच असते. मात्र त्यांच्या साठवणुकीच्या तापमानावर नियंत्रण ठेवून खराबीचे प्रमाण घटवता येते.
शेतकऱ्यांना कमी खर्चात व शेतमाल खराब होऊ नये म्हणून थंड ठेवणारा झिरो एनर्जी कूल चेंबर बांधावा असे आवाहन कृषिदूत आकाश मांडे व अवधूत धुमाळ यांनी केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
असा बांधावा शीतकक्ष
शीत-कक्षाची बांधणी विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशी नेहमी मिळू शकणारी साधने वापरून करता येते. या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे 10 ते 15 डिग्री से. ने कमी असल्याने व तुलनात्मक आर्द्रता 90 टक्के राहात असल्याने कोरड्या ऋतूत त्याचा जास्त उपयोग होतो.