चाफळ -शहरातील लोकांचे लोंढेच्या लोंढे करोना महामारीच्या संकटामुळे आपआपल्या मुळ गावी येत आहेत. त्यांना गावातील शाळेत, समाज मंदिरात किंवा इतर तत्सम सुरक्षित ठिकाणी क्वारंटाइन करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक गावातील संबंधित करोना ग्रामस्तरीय समिती तसेच प्रशासनातील इतर घटकांची जबाबदारी आहे. मात्र, शासन दरबारी अनेकजण क्वारंटाइन असलेतरी गावरदरबारी मोकाट असे चित्र पहावयास मिळत आहे.
प्रशासनाकडे कागदावर क्वारंटाइन असलेल्या लोकांना फिरताना अडवायचे कुणी? नवीन आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी पुढे होऊन ती व्यक्ती अंगावर घ्यायची कुणी? हे मुख्य प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भांडण, तंटे होण्यापेक्षा ‘तेरी भी चूप…मेरी भी चूप’ यानुसार ग्रामीण भागातील चित्र पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी गावपुढाऱ्यांच्या इशाऱ्यांवर तसेच राजकीय दबावाखाली ग्रामस्तरीय समित्यांचा तसेच ग्रामसेवकांचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भविष्यातील राजकारणाच्या चिंतेपोटी आपले राजकीय वजन वापरून राजकीय लागेबांधे जपणाऱ्या ह्या गावपुढाऱ्यांची ही चूक गावाच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते, याचे भानच राहिलेले नाही. त्यामुळे राजकीय भूमिका बाजूला ठेवून कोणताही गटतट, पक्ष न मानता गावाच्या सुरक्षिततेचा तसेच निरोगी भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. बाहेरून येणाऱ्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, हीच क्वारंटाइन केलेली व्यकती या ना त्या कारणाने गावभर फिरत आहे. त्यांना रोखायचे कुणी? का फिरतो म्हणून प्रश्न करून भांडण, तंट्या सारखे प्रकार घडत असल्याने अंगावर घ्यायचे कुणी? अशी चर्चा आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क चा वापर यामुळे ग्रामपंचायतीने दंडाच्या दवंड्या दिल्या गेल्या. मात्र, आता किती जणांना दंड केला हा संशोधनाचा विषय आहे. तर या समित्या नावालाच राहिल्या आहेत, असेच दिसत आहे.
शासन दरबारी क्वारंटाइन; गाव दरबारी मोकाट
बहुतांश गावांतील ग्रामस्तरीय समित्या तसेच ग्रामसेवक हे संबंधित गावांतील गाव पुढाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. राजकीय दबाव टाकून राजकीय हितसंबंध जपत आपल्या भविष्यातील राजकारणाची पोळी भाजून घेणारे गावपुढारी तसेच राजकीय दबावाखाली काम करणारे ग्रामसेवक तसेच ग्रामस्तरीय समितीचे पदाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणार का? अशी विचारना होत आहे.