शिक्रापूर (वार्ताहर) –पुणे – नगर महामार्गाजवळून वाहणारी वेळ नदी ऐन उन्हाळ्यामध्ये तहानलेली आहे. या नदीवर असलेले सर्व बंधारे कोरडे पडलेले असल्याने या भागातील विहिरी तसेच विंधन विहिरींची देखील पातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली असल्याने वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी जोर धरीत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यावर शिक्रापूर, जातेगाव, तळेगाव ढमढेरे येथील अनेक वाड्यावस्त्यांवरील शेतीचे तसेच नागरिकांचे पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहे. या नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते त्यामुळे नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होते तर पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होत असते.
तसेच या नदीचे बंधारे भरलेले असल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी वाढलेली असल्यामुळे ग्रामस्थांना योग्य पद्धतीने पाणी वाटप होत असत; परंतु सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असून उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असल्यामुळे आता नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे, त्यामुळे वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी आमदार अशोक पवार व चासकमान पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे; मात्र चासकमान धरणातील पाण्याचे नियोजन पाहून लवकरच पाणी सोडले जाईल.
– बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता