बंगळुरू: ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना जास्त सामन्यांमध्ये संधी दिली पाहिजे असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने सांगितले.
युवा खेळाडूंना ज्या काही चार-पाच सामन्यांमध्ये संधी मिळेल, त्यामध्ये त्यांनी लक्षवेधक कामगिरी केली पाहिजे असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच विधान केले होते. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना धवन म्हणाला, युवा खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळाल्यानंतर त्यांना या संघाशी जुळवून घेण्यासाठी थोडासा कालावधी लागणारच. युवा खेळाडू प्रत्येक संधीचा उपयोग करण्यासाठी धडपड करतातच. मात्र केवळ तीन चार सामन्यांमध्ये त्यांच्या कौशल्याची चाचणी होणे प्रत्येक वेळी शक्य नसते. संघ व्यवस्थापनाने अशा खेळाडूंना अधिकाधिक सामन्यांमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करावा.
ऋषभ पंत व श्रेयस अय्यर यांना सूर सापडण्यासाठी आम्ही वरिष्ठ खेळाडू कायमच सहकार्य करीत असतो. हे दोघेही लवकरच यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. जेव्हां जेव्हां युवा खेळाडू आमच्याकडे मार्गदर्शन किंवा सल्ला घेण्यासाठी येतात तेव्हां तेव्हां आमची दारे त्यांच्यासाठी सदैव खुलीच असतात. युवा खेळाडूंवर कोणतेही दडपण येणार नाही याची आम्ही काळजी घेत असतो असेही धवनने सांगितले.
इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत झालेल्या दुखापतीविषयी धवन म्हणाला की, या दुखापतीमधून तंदुरूस्त झाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात मला खेळण्याची संधी मिळाली. जरी मी तेथे भरपूर धावा करू शकलो नाही तरी माझा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी हा दौरा खूपच उपयुक्त ठरला.