सरलेले 2076 हे संवत्सर वर्ष गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोणातून अतिशय वेगवान घडामोडीचे होते. या वर्षात शेअर बाजार निर्देशांक तब्बल 40 टक्क्यांनी कोसळले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर निर्देशांकानी ही घट भरून काढली. त्याचबरोबर दहा टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला.
शनिवारी मुहूर्त ट्रेडिंगवेळी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली. सरलेल्या पूर्ण वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 11.2 क्क्यांनी वाढून 43,443 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षात 9.8 टक्क्यांनी वाढून 12,720 बंद झाला.
संवत्सर 2026 या वर्षाने जेवढे चढउतार पाहिले आहेत तेवढे चढ-उतार यापूर्वी एका वर्षात कमी वेळा पाहिले गेले आहेत. मार्च महिन्यामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर केंद्र सरकारने 84 दिवसांचे लॉक डाऊन अंमलात आणले. या काळात निर्देशांकांचे अतोनात नुकसान झाले. त्या काळात निर्देशांक जवळजवळ 40 टक्क्यांनी कमी झाले.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी पातळीवर ठेवले. भारतात लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले तरी मनुष्यहानी मात्र कमी झाली. या कारणामुळे लॉक डाऊन बंद करण्यात येऊ लागल्यानंतर अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येऊ लागल्याची लक्षणे दिसत आहेत.
भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानी जोरदार घोड-दौड सुरू केली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये निर्देशांकात तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन महिन्यांत झालेल्या वाढीमुळे 40 टक्क्यांची घट भरून निघाली. त्याचबरोबर वार्षिक पातळीवर निर्देशांक परतावा देऊ शकले. सरलेल्या वर्षात निर्देशांक जेवढे कोसळले तेवढेच वाढले आहेत. 2009 नंतर शेअर बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी अनिश्चित परिस्थिती प्रथमच निर्माण झाली.
यापूर्वी शेअर बाजारात अशी अनिश्चित परिस्थिती 2001-2 आणि 1991-93 या काळामध्ये निर्माण झाली होती. मात्र यापूर्वी जेव्हा निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले होते त्यानंतर निर्देशांक पूर्वपदावर यायला बराच काळ लागला होता. यावेळी परिस्थिती बदलली आहे. निर्देशांक जेवढ्या वेगात कोसळले तेवढ्याच वेगात वाढले आहेत. भारत सरकार बरोबरच जगातील मोठ्या अर्थव्यवस्थानी या काळात पॅकेज जाहीर केल्यामुळे निर्देशांक पूर्वपदावर येण्यास मदत झाली. निर्देशांक एकदा वाढू लागल्यानंतर अनेकांनी निर्देशांक गरजेपेक्षा जास्त वाढले आहेत असा इशारा देऊनही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक चालूच राहिली.
आता भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा लवकर पूर्वपदावर येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात निर्देशांक कमी अधिक प्रमाणात आगेकूच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सरलेल्या वर्षातील अनिश्चित परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर कमालीचा विश्वास दाखविला आहे. या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
विकसीत देशातील रिझर्व्ह बॅंकांनी मोठ्या प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण केली आहे. विकसित देशांपेक्षा भारतातील व्याजदर जास्त आहेत. या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार आकर्षक वाटत आहेत. करोना व्हायरसमुळे संवत्सर 2076 वर्षात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली होती. 2077 मध्ये एवढी अस्थिरता राहण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे आगामी संवत्सर 2077 निश्चित चांगला परतावा देऊ शकेल असे तज्ञांना वाटते. आगामी वर्षात परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार आकर्षक राहतील. त्याचबरोबर सन 2021-22 आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था किमान 8 टक्के दराने वाढणार आहे. अमेरिकेतील व्याजदर किमान दोन वर्ष 0 टक्क्यांच्या जवळपास राहणार आहेत. या कारणामुळे आगामी वर्षात शेअर निर्देशांक 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता अधिक आहे.