प्रशासना विरोधात सरपंच तांबोळी यांचा उपोषणाचा इशारा
यवत- यवत (ता. दौंड) येथील यशवंतनगर येथील गट क्रमांक 914 मधील जागा ग्रामीण रुग्णालय यांना ट्रामा सेंटरसाठी 0.10 आर जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करणे व ग्रामीण रुग्णालय यवत यांच्याकडील 0.06 आर जागा ग्रामपंचायतीला रस्त्यासाठी हस्तांतरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने मुख्याधिकारी पुणे यांची परवानगी घेतलेली आहे. 2015 पासून ते आज अखेर पर्यंत मागणी केलेली असताना मंडल अधिकारी कार्यालय, यवत यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेश प्राप्त झाले असताना मंडल अधिकाऱ्यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सदर विकासकामांसाठी प्राप्त निधी असूनही विकासकामे करता येत नाहीत, असे यवतच्या सरपंच रझिया तांबोळी यांनी सांगितले.
यवत येथून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला असून येथील आवश्यक ती कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही महामार्गाचे अधिकारी कोणतेही कार्यवाही करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदरच्या कामांबाबत रस्ते विभागाच्या कार्यालयाकडून योग्य कामांची पाहणी करून ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत. अन्यथा ग्रामस्थांसह सोमवारी (दि.18) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यवत ग्रामपंचायतीच्या सरपंच तांबोळी यांनी तहसीलदार दौंड व पुणे-सोलापूर एक्स्प्रेस वेच्या अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यादववाडी, घिगेवाडी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्याकडील यवत स्टेशन येथील गट क्रमांक 438 मधील ग्रामपंचायतीने 0.05 आर जागा मागणी करून ग्रामपंचायतीने शासकीय बाजार भावानुसार 35 हजार 350 रुपये भरून जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित कार्यालयाने पत्रव्यवहार केलेला आहे.
सदर जागेचा पंचनामा करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सदर वस्तीचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवता आलेला नाही. विकास कामांचे प्रस्ताव पाहता ते मंजूर किंवा योग्य ती कार्यवाही झाली असती तर मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करता आली असती. मंडल अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही सहकार्य करीत नाही. सदरचे पंचनामे करण्यासाठी विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर, तहसीलदार दौंड यांनी वेळोवेळी मंडल अधिकारी कार्यालय यवत यांना सांगूनही त्यांनी या कामांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकासकामे करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे सरपंचांनी निवेदनात म्हंटले आहे.