वासुंदे गावातील शेतकरी सरकारला अहवाल पाठविणार
वासुंदे- वासुंदे (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये राज्यातील पहिला सरसकट कर्जमाफी व शेतकऱ्यांना भरघोस मदतीचा ठराव घेण्यात आला आहे, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, याची अद्यापही भरघोस मदत मिळालेली नाही त्यामुळे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असून त्यासंदर्भात प्रशासनाकडून त्वरीत कार्यवाही होणे गरजेचे आहे, असा ठरावही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आला आहे. याच एक प्रत सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वासुंदे गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठरावास एकमताने संमत केला असून भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार काय योजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आस्मानी संकटांनी बेचिराख झाला आहे, यातून शेतकऱ्याला सावरण्याची अत्यंत भरघोस मदतीची गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या मदतीची खूप मोठी गरज आहे. परंतु, सरकारच्या वाटाघाटी सुरू असल्याने शेतकऱ्यांना सध्या तरी कोणीही वाली नाही येणाऱ्या काळात नवीन सरकारकडून लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली आहे.
वासुंदे प्रमुख्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अध्याप कित्येक
शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान त्वरित मिळावी अशीही मागणी करण्यात आली असून मागील वर्षी या भागात प्रचंड दुष्काळ असताना इतर तालुक्यात शेतकऱ्यांना फळबाग अनुदान भेटले. परंतु, दौंड तालुक्यात फळबाग अनुदानचा एक रुपयाही मिळालेला नाही. ग्रामसभेत याच मुद्यांवर चर्चा करण्यात येवून या मागण्यांसाठी एकमुखी पाठींबा देण्यात आला.
- कर्जमाफीचा मुहूर्त कधी ठरणार?
सध्या, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे; त्यामध्ये अजित पवार एका जाहीर सभेत संबोधित करताना आम्हाला सत्ता द्या.., पहिल्या तीन महिन्यांत कर्जमाफी करतो, असे सांगत आहेत. भाजपा सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीमध्ये फार चुका झालेल्या असून यावर आम्ही समाधानी नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत. या पोस्ट सध्या शेतकरी कुटुंबातील नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुहूर्त कधी ठरणार? यावर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.