प्रतिभाताई पाटील; डॉ. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव वर्षास शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कराड – चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्व असलेले जे काही राजकारणी आहेत. त्यांच्यात यशवंतराव मोहिते यांचे नाव अव्वल स्थानी आजही आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द अत्यंत चांगली गाजऊन जनमानसात छाप उमटवली होती. ते तात्विक विचारांनी घट्ट होते आणि हे विचार व ध्येय त्यांनी जनमानसाच्या कल्याणासाठी मार्गी लावले असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजीत केलेल्या कार्यगौरव समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, सौ.वंदना चव्हाण, प्रा. संजय मंडलीक, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार मोहनराव कदम, विश्वजीत कदम, शेखर निकम, शेखर निकम, देवीसिंग पाटील, शिवाजीराव कदम, प्रा. एन. डी. पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या वरील तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात मोहिते यांच्या भाषणांचे घणाघात, आमचे भाऊ आणि त्यांनी केलेल्या कार्याची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, यशवंतराव मोहिते यांनी राजकारणात सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांनी तत्वाशी व विचारांशी कधीच तडजोड केली नाही. सामान्य लोकांच्या हिताचा विचार करताना राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, सत्ता हा विषय यशवंतराव मोहितेसाठी कधीही महत्वाचा विषय नव्हता. पण महाराष्ट्र घडला पाहिजे, हा विचार जोपासणाऱ्या लोकांमध्ये त्यांचे नाव महत्त्वाचे होते आणि आजही आहे. त्यांच्या कार्याची माहिती युवा पिढीसमोर येण्याची गरज आहे. यशवंतराव मोहिते यांना शेतकऱ्यांची चांगली जाण होती.
काही कर्तृत्ववान माणसे राजकीय पटलावर होऊन गेली. यामध्ये यशवंतरावांचे नाव महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम भाऊंनी केले. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मंत्रिमंडळात असताना भाऊंनी एका विषयावर बारा तास भाषण देवून मुद्दे सांगण्यासही त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा दबदबा राज्याच्या राजाकरणासह विधानसभेतही दिसतो. सत्ता त्यांच्यासाठी कधीही महत्वाचा विषय नव्हता. मात्र महाराष्ट्र घडला पाहिजे, यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.आ. चव्हाण म्हणाले, सध्याचे राजकारण व त्यांचे विचार यामध्ये मोठा फरक आहे.
मात्र तो फरक ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी कधीही केला नाही. प्रवृत्तीत बदल न करता तत्वाने विरोध करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यामुळेच सर्वाधिक चांगले निर्णय घेवून मोहिते यांनी राज्याच्या जडणघडमीत मोठे योगदान दिले आहे. त्याच विचारांची आणि तत्वाची सध्याच्या राजकारणात गरज आहे. नव्या पिढीला यशवंतराव मोहिते यांचे त्यांचे विचार निश्चितच मार्गदर्शक आहेत. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. जयंत पाटील यांनाही मनोगत व्यक्त करताना यशवंतराव मोहिते यांविषयी माहिती असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी प्रास्ताविक केले. आ. विश्वजीत कदम यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. इंद्रजीत मोहिते व आ. विश्वजीत कदम यांनी स्वागत केले. विवेक रणखांबे यांनी सुत्रसंचालन केले.