नारायणगाव – भाविकांना अष्टविनायकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी शासनाचा अष्टविनायक रस्त्यांची निर्मिती करण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे जात आहे. अष्टविनायक रस्त्याच्या निर्मितीमुळे भाविकांना प्रवासाचे अंतर कमी होऊन कमी वेळेत अष्टविनायक यात्रा पूर्ण करता येणार आह; परंतु याच अष्टविनायक रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पूल मृत्यूचा सापळा बनले आहे.
अष्टविनायक रस्त्यावरून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांना ट्रॅक्टर व बैलगाड्यांच्या साह्याने ऊस वाहतूक होते. या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अर्धवट काम झालेल्या पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
नारायणगाव पोलिस स्टेशन (ता. जुन्नर) ते भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव, ता.आंबेगाव) पर्यंत एकूण नऊ पूल असून त्या पुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत झालेले आहे. कॉन्ट्रॅक्टदाराने अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने कोणतेही संरक्षण कठडे व प्रवाशांना मार्गदर्शक फलक लावलेले नाही.
पुलाच्या दोन्ही बाजूने डांबरीकरण केलेले रस्ते जेथे संपतात तिथे मोठ मोठे खड्डे व खटक्या तयार झालेल्या आहेत. मार्गदर्शक फलक नसल्यामुळे अष्टविनायक रस्त्यावरून प्रवास करीत असणाऱ्या वाहनचालकाला अर्धवट अवस्थेत बांधकाम असलेल्या पुलावरील रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येणारे वाहन खड्ड्यांमध्ये जोराने आदळून अपघात घडत आहेत.
आजपर्यंत अनेक जण या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले आहेत. तर वाहन जोराने आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधींनी अष्टविनायक रस्त्यावरील अर्धवट पुलांचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
धुळीमुळे जडताहेत श्वसनाचे आजार
अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी झालेले वाहन चालक व प्रवासी तसेच वाहनांच्या नुकसानीची जबाबदारी कोण स्वीकारणार असा संतप्त सवाल रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक विचारत आहे. शिवाय परिसरात राहणाऱ्या लोकांना अर्धवट पुलांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे. तर घरातील आजारी वयोवृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले यांना श्वसनाचे आजार निर्माण झाले असल्याच्या तक्रारी लोक करू लागले आहेत.