सोमेश्वरनगर येथे अजित पवार यांचा हर्षवर्धन पाटलांवर वार
सोमेश्वरनगर – अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता. तसेच आम्ही हर्षवर्धन पाटील यांना 50 ते 55 फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, मी स्वत: कित्तेक वेळा त्यांना पुण्याच्या घरी भेटायला गेलो. पण सध्या ते फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पावती फाडायचे काम करीत असल्याचा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटलांवर केला आहे.
सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विज्ञान महाविद्यालय, मुलींच्या वसतिगृह भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादचा मुद्दा पुढे केला जात आहे. 370 बद्दल बोलले जातेय, कंपन्या बंद पडत आहेत, समाजातील प्रत्येक घटक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. यांच्याकडे ढुंकून पाहिले जात नाही, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी मिळत नाही, लोकांना भावनिक बनवले जातेय, काहींना भीती दाखवून तर काहींना नोटिसा पाठवून पक्षात घेतले जाते, यांना सत्तेचा माज, सत्तेची नशा चढली असल्याची टीका अजित पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांना पृथ्वीराज चव्हाणांनीही त्यांना “थांबा’ सांगितले. एकाला विधानसभा आणि दुसऱ्याला विधानपरिषद असा मार्ग काढत होतो. परंतु त्यांचा निर्णय आधीच झाला होता. तसेच विनाकारण समाजात गैरसमज पसरवून बदनाम करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.