2025 पर्यंत “टीसीएस’मधील 75 टक्के कर्मचारी करणार घरातून काम
नवा सुरक्षित प्लॅटफॉर्म विकसित; कार्यालयाला जागा कमी लागणार
पुणे : लॉकडाऊनच्या काळात जुलमाचा रामराम म्हणून आयटी कंपन्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागले. मात्र ही पद्धत कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याची ठरू लागली आहे. “टीसीएस’ या भारतातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे 20 टक्के कर्मचारी सध्या घरातून काम करत आहेत. 2025 पर्यंत कंपनीच्या साडे चार लाख कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचारी घरातून काम करणार आहेत. यामुळे कार्यालयासाठी कमी जागा लागेल. यातून आयटी कंपन्यांसाठी एक नवीनच मॉडेल विकसित होऊ लागले आहे.
भारतात हजारो आयटी कंपन्या लाखो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देशविदेशात सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे या कंपन्यांना “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून खर्च कमी करण्याच्या फॉर्म्युला सापडला आहे. “टीसीएस’ गेल्या 20 वर्षांपासून आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना कार्यालयात आणून त्यांच्या माध्यमातून काम करवून घेते. यासाठी कर्मचाऱ्यांना मोठा प्रवास करावा लगतो. त्याचबरोबर ऑफिसचे भाडे, वीज, मेन्टेनन्स, इत्यादी खर्चही लागतात. आता कंपनीने 2025 पर्यंत साडे चार कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची रुपरेषा तयार केली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे साधारणपणे 20 टक्के काम सध्या “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून चालते. आता नव्या पद्धतीमुळे फक्त 25 टक्के कर्मचारी कार्यालयात येतील आणि 100 टक्के काम पूर्वीप्रमाणे होईल, असे “टीसीएस’चे मुख्य कार्यचालन अधिकारी एन.जी.सुब्रमण्यन यांनी सांगितले.
लॉकडाऊननंतर “टीसीएस’कंपनीला धावपळ करून 90 टक्के कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची यंत्रणा विकसित करावी लागली. या कालावधीत “टीसीएस’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी पुढाकार घेतला. या काळात “इंटरॅक्शन प्लॅटफॉर्म’वरून 35 हजार मिटींग झाल्या. 40 लाख कॉल झाले, तर 340 लाख मेसेजची देवाणघेवाण झाली.
यासाठी “टीसीएस’चे आगोदरच “एसबीडब्लूएस’नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला होता. आता या प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयात त्याच्या एकूण कामाच्या वेळेपैकी फक्त 25 टक्के वेळ कार्यालयात काम करणे अपेक्षित आहे आणि उरलेला 75 टक्के वेळ तो कोठूनही काम करू शकेल. याचा अर्थ कार्यालयासाठी लागणारी जागाही 15 टक्के कमी लागण्याची शक्यता आहे, असे रिऍल्टी क्षेत्रातील तज्ञांना वाटते. “टीसीएस’ने असा पुढाकार घेतल्यास देशातील इतर कंपन्याही त्याचे अनुकरण करू शकतील. यामुळे कमी खर्चाचे आयटी कंपन्यांचे नवीन मॉडेल उदयास येईल.