पालघर: पालघर जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या आधी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. या प्रकरणी आतापर्यंत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन केले असून 35 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गडचिंचलेसह आजूबाजूच्या गावातील लोकांच्या जमावाने चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची हत्या केली होती. यानंतर कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एका पोलीस उप निरीक्षकाला तत्काळ निलंबित केले होते. आज पुन्हा एएसआय साळुंखे, हवालदार संतोष मुकणे, नरेश धोडी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करुन पोलीस अधीक्षक गौरव सिंग त्यांच्या निलंबनाचे आदेश यांनी दिले आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात दोन अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मंगळवारी (28 एप्रिल) याच प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कासा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या 35 पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बदली केली. दरम्यान या हत्याकांडातील 110 आरोपींना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पकडण्यात आले आहे. इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस दल ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत.