जिल्हाधिकारी : करोना उपचारांसाठी बेड्स पुरेसे
पुणे – ‘पुणे शहरात करोनाबाधित वाढत आहेत, ही बाब खरी आहे. समूह संसर्ग आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. मी काही तज्ज्ञ नाही. मात्र, प्रशासनाने समूह संसर्ग समजूनच तयारी केली असून त्याच पद्धतीने कार्यवाही आहे.’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी करोनाच्या समूह संसर्गाबाबत भाष्य केले.
राज्यात मुंबईपेक्षा अधिक बाधित पुण्यात आढळत आहेत. त्यामुळे समूह संसर्ग असल्याची चर्चा तज्ज्ञांकडून होत आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, “पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये सरासरी दररोज दहा हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे या काळात बाधित वाढल्याचे दिसून येत आहे; परंतु मृत्यूदर स्थिर आहे. रविवारी सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली, मात्र त्यातील अनेक मृत्यू हे दोन ते तीन दिवसांपूर्वीचे होते’.
पुण्यात करोनाबाधितांसाठी बेड उपलब्ध आहेत. पुण्यात 17 हजार 54 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, करोनामुक्तीचे प्रमाण 64 टक्के आहे. शहरामध्ये ससूनमध्ये 50, पालिकेच्या दळवी रुग्णालयात 6, ज्युपिटरमध्ये 17 आयसीयू बेड निर्माण केले आहेत. तर बुधरानी रुग्णालयातील 300 बेड करोना रुग्णांसाठी ठेवण्यात येणार आहेत.
स्थानिक पातळीवर उपचारांवर भर
शहरातील रुग्णालयांमध्ये ग्रामीण व बाहेरील रुग्णांची संख्या 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध करून देऊन उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी मंचर येथे रुग्णालय सात दिवसांत उभारण्यात आले. भीमाशंकर येथील रुग्णालयात सोळा आयसीयू बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ज्या भागातील रुग्ण आहेत, त्या भागातच उपचार मिळाल्यावर शहरावर येणारा ताण कमी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊन काळात प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि बेड वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा असा झाला की, 35 ते 40 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. तसेच विमाननगरमध्ये अडीच हजार बेड्सचे कोविड केअर सेंटर तयार केले जात आहे.
– शंतनू गोयल, अतिरिक्त आयुक्त, मनपा