मुरादाबाद – लहान वयातच वडीलांचे छत्र हरपले, आईला समाजाने वाळित टाकले, अपमानित केले मात्र, याच सावित्रीच्या लेकीने भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाला विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता तीच अर्चना देवी ही विजयाची शिल्पकार ठरलेली मुलगी गावकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
आयसीसीच्या पहिल्या वहिल्या 19 वर्षांखालील मुलींच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अर्चना देवीने अंतिम लढतीत इंग्लंडच्या ग्रेस क्रीवन्स व नियाम हॉलॅंड या दोन फलंदाजांना बाद केले व विजयात मोलाचा वाटा उचलला. अर्थात या यशासाठी तीलाच नव्हे तर तीच्या संपूर्ण कुटुंबाला अत्यंत संघर्ष करावा लागला. वडीलांचे कर्करोगाने निधन झाले व अर्चनाच्या आईला समाजाने वाळित टाकले. तीला अपमानीतही केले.
समाजाचा त्रास आपल्या मुलीलाही सोसावा लागू नये यासाठी सावित्री देवी यांनी अर्चनाला बोर्डिंग स्कुलला दाखल केले. तेव्हाही मुलीला चुकीच्या मार्गावर पाठवल्याची टीका झाली. त्यातच देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अर्चनाचा भाऊ रोहित याची नोकरीही गेली होती. मात्र, या सगळ्या परिस्थितीशी दोन हात करत तीने आपल्या लेकीचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शब्दातही कथन करता येणार नाही असा संघर्ष केला.
मुलीला विकल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले मात्र, अखेर सावित्रीच्या या लेकीने देशाकडून खेळताना विश्वकरंडक विजयात मोलाचा वाटा उचलला तेव्हा सावित्री यांच्या घरी एक ग्लास पाणीही पिण्यात कमीपणा समजणारे सर्व नातेवाईक तीच्याच घरी आनंदाने जल्लोष करत होते. सावित्री यांचे पती व मुलगा यांनी अर्चनाला क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करु दे असा शब्द सावित्री यांना दिला व सावित्री यांनीही अपार कष्ट करुन अर्चनाला देशाकडून खेळण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केला. याच संघर्षातून देशाला एक कर्तबगार क्रिकेटपटू मिळाली.
कुलदीप यादवची मोलाची मदत
भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने अर्चनाला क्रिकेट खेळताना पाहिले होते. त्यानेही पुढाकार घेत तीला प्रोत्साहन दिले. ज्या अकादमीत कुलदीप यादवने क्रिकेटचे धडे गिरवले त्याच अकादमीतून अर्चना आज पुढे आली. तीला कुलदीपसह पुनम गुप्ता व कपिल पांडे यांचेही एक प्रशिक्षक म्हणून बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. आता येत्या काळात अर्चना आंतरराष्ट्रीय क्रिकेट निश्चितच गाजवेल असा विश्वास कुलदीपनेही व्यक्त केला आहे.